नागपूर: आज भाजपला वाटतंय की काहीतरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ. महाआघाडीचं सरकार पडावं यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. उम्मीद पे दुनिया कायम है| उम्मीद रखो लेकीन आनेवाले १५ साल तक| महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त केले.
धनंजय मुंडे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना नाही तर सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करत असल्याचा भास झाला. फडणवीस साहेब, तुम्हाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांप्रती नितांत आदर आहे. मग तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला शब्द का पाळला नाही? सत्तेत येण्यासाठी भाजपने केंद्राच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थाचा वापर केला. लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या भाजपा सरकारला खरी लोकशाही काय असते हे महाविकास आघाडीच्या सरकारने दाखवून दिले आहे. दिलेला शब्द पाळला नाही तर बहुमत मिळूनही पायउतार निश्चित असतो, असे मुंडे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीवरून देखील मुंडेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ऐतिहासिक कर्जमाफीचा गाजावाजा केला. ऑनलाईन फॉर्म माथी मारत माझ्या शेतकऱ्याला तासंतास लाईनीत उभं केलं. जाचक अटी लादल्या. मात्र कर्जमाफी काही झाली नाही. त्याचाच परीणाम म्हणून आज भाजपला विरोधी बाकावर बसावे लागत असल्याचे मुंडे म्हणाले.
मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन झाले. यांनी स्मारकाची साधी वीट तर रचली नाहीच उलट शिवस्मारकाच्या निविदेत भ्रष्टाचार केला. माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, या निविदा प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. या महाविकास आघाडी सरकारला शेतकरी, बेरोजगार तरूण, असुरक्षित मायभगिनी, समाजातील प्रत्येक वंचित घटकांच्या कल्याणासाठी झटायचं आहे. लोकांसाठी झटणं हा जर स्वार्थपणा असेल तर मी छातीठोकपणे सांगतो की हो आम्ही स्वार्थी आहोत.