लोणी धामणी -गेली सात वर्षे बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि ग्रामीण भागातील विशेषत पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा मालकांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत. यात्रा जत्रांना होणारी बैलगाड्याच्या शर्यतीला गर्दी त्यामुळे सुरू झालेले अर्थकारण आणि त्यातूनच बैलांच्या वाढत्या किमती यामुळे बैलगाडा मालक आणि शेतकरी यांचा देखील चांगला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.धामणी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत सदस्य आकाश जाधव,संदेश जाधव,गणेश जाधव यांनी चार महिन्यापूर्वी ३६ हजार रुपयाला हा बैल संजय जाधव यांच्याकडून खरेदी केला होता.
त्यानंतर या ” रावण ” बैलाने अगदी कमी कालावधीत आपले व मालकांचे नाव संबंध पुणे जिल्ह्यत गाजवले .काल अखेर रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक सर्जेराव खेडकर यांनी तब्बल २१ लाख रुपये देऊन या बैलाची खरेदी केली. या परिसरातील आजवरची ही सर्वात विक्रमी किंमत असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही या बैलाचे शिस्तबद्ध पळणे आणि अजून तब्बल दहा वर्षे पळण्याची क्षमता असल्याने आम्ही त्याला एवढी रक्कम दिल्याचे खेडकर यांनी सांगितले.यावेळी आकाश जाधव, जाधव,संदेश जाधव,गणेश जाधव ,आनंदा संजय जाधव,रंगनाथ जाधव,गणेश जाधव हे उपस्थित होते.
बैलांच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे सामान्य बैलगाडा मालकांना मिळणारा नफा नक्कीच कौतुकास्पद आहे.बैलगाडा शर्यत परंपरा शेकडो वर्षापासून आपण आजवर अतिशय पारंपरिक पद्धतीने जोपासत आहे.आजचा तरुण वर्ग जास्त प्रमाणात बैलगाडा क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. परंतु या तरुण वर्गाने आपला कामधंदा पाहून आपले कुटुंब पाहून ही परंपरा जपली पाहिजे. जाधव मंडळींना बैलाची चांगली रक्कम मिळाली त्यांचे देखील अभिनंदन
मयुर सरडे-उपसरपंच शिरदाळे