Dhairyasheel Mane । लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव केला. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने ३१ तर महायुतीने १७ जागा जिंकल्या. दरम्यान, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
मी वादळात दिवा लावला Dhairyasheel Mane ।
निवडणूक निकालानंतर खासदार धैर्यशील मानेयांनी एका कार्यक्रमात बोलताना, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लोकसभा निवडणूक लढलो. मोठ्या ताकदीने या निवडणुकीत यशस्वी झालो. पश्चिम महाराष्ट्रात अनेक बुरुज ढासळले आणि मी वादळात दिवा लावला. खासदार माने म्हणाले, “या निवडणुकीत लोकांमध्ये वेगळं वातावरण तयार झालं होतं आणि आपल्या मागे मोठी ताकदही नव्हती. कुठलाही साखर कारखाना, कुठलीही सूत गिरणी, दूधसंघ आपल्या पाठीशी नसताना आपण ही निवडणूक लढलो आणि जिंकलो. केवळ सामान्य माणसाच्या ताकदीमुळे आपण ही निवडणूक जिंकलो. अनेक उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं. परंतु मातब्बर उमेदवार पडले. कोणत्याही सर्वक्षणात, कोणत्याही एक्झिट पोलमध्ये मी ही निवडणूक जिंकेन असं सांगितलं नव्हतं.
निकालानंतर मला कळलं मटका कसा… Dhairyasheel Mane ।
हातकणंगलेचे खासदार म्हणाले, माझे काही मित्र आहेत, मी त्यांचं नाव सांगणार नाही, ते मला सांगायचे की तुमचा दर खाली आहे, त्यामुळे तुम्ही निवडून येणार. मला ती गोष्ट समजायची नाही, दर खाली म्हणजे नेमकं काय? नंतर समजलं की हे लोक मटका खेळायचे. तुमचा दर खाली म्हणायचे आणि वर सांगायचे तुम्ही निवडून येणार. निवडणुकीच्या निकालानंतर मला कळलं मटका कसा लागतो ते समजलं. या मटका लावणाऱ्यांचं सर्वेक्षण वेगळं असतं. एक्झिट पोलचे सर्वेक्षण आणि यांचे सर्वेक्षण हे खूप वेगवेगळे असतात. हा चेष्टेचा विषय बाजूला सोडला तर ही निवडणूक म्हणजे मटका नव्हती. हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय होता. हा देश कोणाच्या हातात द्यायचा हे लोकांना ठरवायचं होतं. त्यामुळे हातकणंगलेच्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र दामोदरदास मोदी या माणसावर विश्वास दाखवला आणि मला त्यांचा शिलेदार म्हणून लोकसभेत पाठवलं” असे त्यांनी यावेळी म्हटले.