शिरवळ – खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीत झालेल्या बेसुमार अतिक्रमणांच्या विरोधात नगरपंचायत, महसूल, बांधकाम विभाग व पोलिसांनी गुरुवारी धडक मोहीम राबविली. रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेली अतिरिक्त बांधकामे या कारवाईत पाडण्यात आली.
रस्त्याकडेला उभारलेल्या पत्र्याच्या शेड, टपऱ्या हटवण्यात आल्या.त्यामुळे अनेक वर्षांनंतर खंडाळ्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न प्रशासनाने मार्गी लावल्याने जनतेने या कारवाईचे स्वागत केले.या कारवाईत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप न घेतल्याने खंडाळावासीय आश्चर्यचकित झाले होते.
खंडाळा शहरात मुख्य रस्त्यावर बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील सर्व दुकानदार, व्यापाऱ्यांनी आपापल्या गाळ्यांसमोर व्यवसायांसाठी पत्र्याच्या शेड उभारल्या होत्या. अनेकांनी रस्त्यावरच पायऱ्या बांधल्या होत्या. त्यामुळे शहरात वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच उरली नव्हती. वाहतुकीत अडथळे येत होते. राजमाता अहिल्यादेवी चौक-छत्रपती शिवाजी चौक रस्ता, पंचायत समितीच्या आसपास ठिकठिकाणी फूटपाथवरच अनेक टपऱ्या टाकण्यात आल्याने शहराचे रूप बकाल दिसत होते.
आठवडा बाजारादिवशी तर शहरात फिरायला जागाच उरत नव्हती. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आय. के. मोदी, पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी संयुक्त कारवाई करत ही अतिक्रमणे हटविली. शहरात गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कारवाई सुरू होती.
मुख्य गावठाणात सरसकट कारवाई सुरू झाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. उर्वरित अतिक्रमणे व अतिरिक्त बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने हटवली. या कारवाईत चार जेसीबी, पाच ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. कारवाईवेळी दोनशे पोलीस व इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.