कार्तिकी यात्रा : वारकऱ्यांच्या गर्दीने पुणे-मुंबई मार्गावर रांगा
तीर्थक्षेत्र देहूत कार्तिक एकादशीसाठी लगबग
वडगाव मावळ – खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशी माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर कोकणातील भाविकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी निघालेल्या दिंड्या मजलदरमजल करीत मावळात दाखल झाल्या आहेत. “ग्यानबा-तुकाराम’चा नामघोष करीत मावळवासियांनी “माऊलीं’च्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.
देहुरोड -तीर्थक्षेत्र देहूत कार्तिक एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. ग्रामपंचायत, श्री संत तुकाराम संस्थान, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयासह विविध सामाजिक संस्थेच्या वतीने विविध कामे करण्यात येत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त, वैष्णव बांधव शनिवारी (दि. 23) होत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त देहूत दर्शनासाठी येत आहेत. तीर्थक्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शनानंतर आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन व संजीवन सोहळा पाहण्यासाठी भाविक वारकरी जात असतात. या भाविकांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी येथील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थान, प्रतिष्ठान, ग्रामपंचायत प्रशासन सरसावले आहे. कार्तिक एकादशीनिमित्त होणाऱ्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त आहे.
या यात्रेनिमित्त विविध भागातील दिंड्यासह कोकणातील दिंड्या देहूत येत असतात. देहू-देहूरोड मार्गावरील झेंडेमळा ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डांबर-खडी मिश्रणाने भरण्यात येत आहेत. देहू ते विठ्ठलवाडी आणि देहू ते झेंडेमळा दरम्यानचा रस्ताही तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर तसेच दुतर्फा असणारी पादचारी मार्ग आणि पदपथावरील अतिक्रमणांकडे प्रशासनाने डोळझाक केल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास अपयश आले आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गटारांची साफसफाई, कचरा कुंड्यावरील कचरा, घाट परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. गाव परिसरात साफसफाई सुरू आहे. डासांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी औषध, ङीडीटी पावडर, धूर फवारणी अद्याप करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाकडून तीन ठिकाणी बाह्यरूग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
शुद्ध व योग्य पाणी पिण्यासाठी वापरण्याची जनजागृती केली जात आहे. भाविकांना यात्रा काळात पाणी टंचाई होवू नये म्हणून इंद्रायणी नदीत पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणातील पाणी 300 क्युसेसने इंदायणी नदीत रविवारपासून (दि. 17) सोडण्यात आले आहे. यात्रा काळानंतरही सोमवारपर्यंत (दि. 25) पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे नारायण गदादे यांनी दिली.
याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने देहू-आळंदी रस्त्यावरील विद्युत दिव्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. गावातील विद्युत दिव्यांची तपासणी करून बंद असलेले पथदिवे विद्यूत विभागाच्या मदतीने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामसेवक गणेश वाळकोळी, सरपंच पूनम काळोखे यांनी दिली.
संस्थानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसविण्यात आले आहेत. भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी दर्शन बारी, मुख्य मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले आहेत. शिळा मंदिराचा जिर्णोद्धाराचे तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील चौघडा व नगरखान्याचे काम सुरू आहे. मंदिर व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त कोकण परिसरातील अनेक पायी दिंड्या मावळ तालुक्यात दाखल झाल्या आहेत. त्यांचे मावळ तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत होत आहे.
वारकरी सांप्रदायेच्या परंपरेचा वारसा व वसा जपणाऱ्या कोकण परिसरातील अनेक दिंड्या शनिवारपासून (दि. 16) मावळात दाखल होत आहे. याशिवाय सोमवार (दि. 18) आणि मंगळवारी (दि. 19) वडगाव व तळेगाव दाभाडे परिसरात दाखल झाल्या आहेत. या पायी दिंड्यांचा 10 दिवसांचा प्रवास असून, यामध्ये एका दिंडीत सुमारे 200 ते 250 लहानथोर वारकरी सहभागी असून, गळ्यात तुळसी माळा, डोक्यावर तुळसी वृंदावन, हातात टाळ, वीणा मृदंगाच्या गजरासह “ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा नामस्मरण करत मजल दरमजल करीत अनेक दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ, काकडा, प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम केला जातो. त्याचबरोबर स्त्रीभ्रूणहत्या, अंधश्रद्धा, पर्यावरण, साक्षरता व माणुसकीच्या शिकवण आदी विषयी जनजगृती करण्यात येते. शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे पोहचून कार्तिकी एकादशी माउलींच्या दारात साजरी करून परतीच्या प्रवासाला निघतो, असे हभप अशोक म्हात्रे, गोरख पाटील, रामचंद्र लावंड आदी वारकऱ्यांनी सांगितले.
कोकणातील दिंड्या मावळात दाखल
नाणे मावळ : कार्तिक एकादशीनिमित्ताने आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पायी निघाले आहेत. “नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी’, या उक्तीप्रमाणे संगणकाच्या युगातदेखील ऊन, वारा, थंडी व पाऊस याचा विचार न करता संस्कृती, परंपरा जपण्याचे काम वारकरी मंडळी करीत आहेत. माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या कोकणातील दिंड्यांचे आगमन मावळात होवू लागले आहे. माता-महिलांच्या डोक्यांवर तुळशीचे रोप, पुरुषांच्या हाती भगवी पताका, तर अनेक जण टाळ-मृदुंगाच्या मदतीने अभंग गात शिस्तबद्ध रीतीने चालताना दिसत आहेत. भल्या पहाटे लवकर पायी वारीला सुरुवात होते.वाटेत अनेक जण आपापल्या परीने वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन केले जात आहे.
देहूगाव परिसराला छावणीचे स्वरूप
1 पोलीस उपआयुक्त, 1 सहायक पोलीस आयुक्त, 22 पोलीस अधिकारी, 115 पोलीस कर्मचारी, 47 महिला पोलीस कर्मचारी, 200 होमगार्ड यासह साध्या गणवेशातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असल्याची माहिती देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस नाईक अशोक नवले, आर. आर. भांगे यांनी दिली आहे. तर तीन पोलीस अधिकारी आणि 56 वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी तयार करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक विभागाचे दिलीप भोसले यांनी दिली आहे.
इंदोरी येथे आज पायी दिंडी सोहळा स्वागत समारंभ
येथे हभप विष्णुजी गणपत काशिद पाटील यांच्या स्मरणार्थ सालाबादा प्रमाणे यावर्षीही पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहा वाजता वारकरी सांप्रदाय अमाणे-लोनाड परिसर (ता. भिवंडी, जि. ठाणे) येथील दिंडीचे आगमन व पालखी सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, असे मावळ तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय काशिद पाटील यांनी सांगितले.