मुंबई – नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची ‘माजी’ ही बिरुदावली लवकरच जाईल. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजप पक्षासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ‘ देवेंद्रजी, कामाला लागा! बहिष्काराने ‘संवाद’ कसा होईल?’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड टीका करण्यात आली आहे. बहिष्कार टाकण्यापेक्षा फडणवीस यांनी शेतकरी, कष्टकरी या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता, असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख ?
भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘105’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची ‘माजी’ ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो!