मुंबई – सरकारने महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे ठेवावेत, असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत राज्य सरकारला हा सल्ला दिला आहे.
राज्यात ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या सातत्याने वाढत असलेल्या घटना, पूजा चव्हाण या भगिनीला न्याय मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी ट्विटमधून दिला आहे.