मुंबई : शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिंदे गटाने एक मोठा दावा केला आहे. 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे असा दावा याचिकेत केला आहे. तसेच राज्यपालांना आम्ही सरकराचा पाठिंबा काढत आहोत असे पत्र देखील राज्यपालांना पाठवलेले आहे.
काही वेळातच सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. आमच्याकडे एकूण 51 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. कालपर्यंत हा आकडा 38 होता. उदय सामंत आल्याने तो 39 झाला आहे. दोन तृतियांशच्या आकड्यासाठी 37 आमदार लागतात. त्यामुळे आमच्याकडे पुरेसा आकडा आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीवर भाजप पक्षाचे लक्ष असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरकार बनविण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविणार आहेत. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी हातमिळवणी करत ‘शिंदे पॅटर्न’ भाजपा राबवण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील आमदारांनी राजीनामा दिल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये येईल त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही. अशावेळी या परिस्थितीचा फायदा घेत भाजपा सरकार बनवण्याचा दावा करेल. राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये जास्तीत जास्त बंडखोर आमदार विजयी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.