न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा बंद होणार नाही
इंदापूर – जोपर्यंत सामान्य जनतेवर, शेतकऱ्यावर, बारा बलुतेदार यांच्यावर अन्याय होत राहील. तोपर्यंत आम्ही लढत राहणार. पतभ्रष्ट झालेल्या अनाचारी वृत्तीचे पोट फाडणार. सामान्याला न्याय मिळवत राहू, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा बंद होणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी-नरसिंह देवस्थानच्या दर्शनासाठी फडणवीस शुक्रवारी (दि. 20) आले होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित स्वागत सभेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, रामभाऊ सातपुते, भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष ऍड. शरद जामदार, इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, भाजपाचे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जागर यात्रा काढली होती. या सभेसाठी टेंभुर्णी येथे आलो होतो. साहजिकच या परिसरात आल्यानंतर आपले कुलदैवत लक्ष्मीनृसिंह दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो. मला पुसटशीही कल्पना नव्हती. इतका भव्य सत्कार आपण कराल.
आपल्या सर्वांच्या आणि आणि देवाच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत देवस्थानच्या विकासासाठी 264 कोटीचा आराखडा तयार केला गेला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार शरद जामदार यांनी मानले.
हर्षवर्धन पाटील काळजी करू नका
हर्षवर्धन पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे, पैशाची थोडी अडवणूक होत आहे; मात्र काळजी करण्याची गरज नाही. नरसिंहाची ताकद प्रचंड आहे. लक्ष्मी नरसिंहच्या कामांमध्ये जो अडथळा आणेल. त्याला वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद मिळेल; परंतु मला खात्री आहे येथे सुरू असलेल्या कामांमध्ये कोणीही अडचण आणणार नाही.