मुंबई : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या निवडणुकीत भाजपाच बाजी मारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना फडणवीसांनी राज्यातील ग्रामपंचायतीत भाजपाचा विजय होईल असे म्हटले. “उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका,” असे फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटले आहे.
“मागच्या वेळेस आम्ही सांगितलेलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या. त्यांनी विचारलेलं कशावरुन आल्या? आमच्या बावनकुळेंनी नावासहीत यादी घोषित केली. तसेच त्या ठिकाणींहून आम्ही भाजपाचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत असंही सांगितलं. त्यामुळे काही काळजी करु नका, पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून आज कोण बाजी मारणार याबद्दल गावागावांमध्ये उत्सुकता आहे.