मांजरी (पुणे) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून हेक्टरी पन्नास हजार आणि त्यापुढे जाऊन उपमख्यमंत्री अजित पवार यांनी दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, केवळ सहा हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसली आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी असलेली पीक विमा योजनाही बासनात गुंडाळली आहे. केवळ शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मांजरी बुद्रुक येथील के.के.घुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाजपच्या शेतकरी संवाद मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप कांबळे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच शिवराज घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सरचिटणीस संदीप लोणकर, विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, गणेश घुले, नगरसेविका उज्ज्वला जंगले, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, उपसरपंच प्रमोद कोद्रे, ज्येष्ठ सदस्य अण्णा धारवाडकर, अमित घुले, शैलेंद्र बेल्हेकर आदींसह भाजपचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “सरकारमध्ये शेतकऱ्यासंदर्भात बोलणारं कोणी नाही. शेतकऱ्याचा विचार करणारं कोणी नाही. पाच वर्षे सातत्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आलं, तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो.
पण, आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहायला तयार नाही. शेतकऱ्यांचा साधा विचारही केला जात नाही. आमच्या कर्जमाफीच्या नावावर नावं ठेवत यांनी घोषणा केली. आमची कर्जमाफीची योजना संपलीच नव्हती. आम्ही निवडणूक झाल्यावर पुन्हा सुरू करू असं सांगितलं होतं. आमच्या योजनेमध्ये 42 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. यांच्या योजनेत फक्त 29 लाख शेतकऱ्यांना झाला. आज शेतकऱ्यांसाठी एकही योजना नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
दरम्यान, रोहिदास उंद्रे यांच्यासह मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याचा मोठा हार घालून विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा सत्कार केला. तर मांजरी बुद्रुक गावचे सरपंच शिवराज घुले व सदस्यांनी फडणवीस यांना बैलगाडीतून मिरवणूक काढत कार्यक्रमस्थळी आणले.
पालिकेत पुन्हा भाजपचा महापौर करू
भाजप सरकारच्या काळात मांजरी बुद्रुक गावात सुमारे दोनशे कोटींची विकास कामे केली. आता 23 गावांबरोबर हे गाव महापालिकेत गेले आहे. असे असले तरी आगामी काळात असलेल्या महापालिका निवडणुकीत समाविष्ट गावांमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील आणि पुन्हा महापालिकेत भाजपचा महापौर होईल, असा विश्वास योगेश टिळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.