मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम करणार नसल्याची मोठी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली होती. मात्र प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकारला २०२४ मध्ये आव्हान देण्यासाठी आघाडी तयार करण्यासाठी ही भेट होती. त्यासाठी रणनिती आखण्यासाठीच प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत.
यावर फडणवीस म्हणाले की, कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024 च्या निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशात सरकार स्थापन होईल, यात शंका नाही.
या भेटीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक असल्याचं शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.