मुंबई : राज्यात मोफत कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोफत लसीकरणाबाबतची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. तरीही मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठलं धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही,” असं फडणवीस म्हणाले. लसीकरणाबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील एका कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सरसकट मोफत कोरोनाची लस द्यायची का याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांनी मांडली आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लसीकरणासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र काही वेळाने आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाबाबतचे ट्वीट डिलीट केले.
मन की बात मध्ये पंतप्रधानांनी केलं स्पष्ट –
“मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. प्रत्येक भारतीयाकरता केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे आणि त्यातून ही लस उपलब्ध होणार आहे. मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठलं धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे.”