अमरावती – त्रिपुरात न घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोर्चे कोणी आयोजित केले? त्यामागे त्यांची भूमिका काय होती याचा तपास व्हायला हवा, असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. अमरावतीतलि दंगलग्रस्त भागात नागरिकांना भेटल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, दंगल घडवण्यासाठी या मोर्चांचे आयोजन केले होत का याचा सखोल तपास होण्याची गरज आहे.
अमरावतीमधील घटनाक्रम दुर्देवी आहे. 12 नोव्हेंबरचा मोर्चा चुकीच्या माहितीच्या आधारावर राज्यभरामध्ये कारस्थान करुन निघाला होता. त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आल्या. याद्वारे देशभरामध्ये समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये निघतात याचाच अर्थ ते नियोजीत होते. मोर्चा आयोकांना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
12 नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये मोर्चाला काय विचार करुन परवानगी देण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे. या मोर्चाच्या नंतर समाजकंटकांनी ज्याप्रकारे दुकाने आणि लोकांना लक्ष्य केले. यातून दंगल घडवायची होती म्हणून एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्माच्या दुकानांवर हल्ला करण्यात आला. त्यातून अमरावतीची परिस्थिती बिघडली, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. कुठल्याही विशिष्ट धर्माला लक्ष करणे आम्हाला मान्य नाही पण त्याचवेळी चुकीच्या घटनेकरता लांगुनचालन होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.