मुंबई – राज्यात वर्षभराच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळाली आहे. तसेच ठाकरे सरकारला मराठा आरक्षणही टिकवित आलेले नाही, अशा शब्दांत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. तसेच सरकारविरोधी मत मांडणाऱ्या व्यक्तींचा आवाज दाबण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषद घेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपदाबाबत न दिलेले आश्वासन लक्षात आहे, परंतू शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदतीसाठी दिलेले वचन लक्षात नाही? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय करणार? असा सवाल विचारत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली.
वर्षभराच्या कालावधीत मराठा आरक्षण, नैसर्गिक आपत्तीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत या मुद्द्यांवरुन फडणवीसांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. भाजपा कधीही कोणाच्याही परिवारावर हल्ले करत नाही, परंतू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून संयम दाखवण्याची गरज असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सरकारविरोधी विचार मांडणाऱ्यांना चिरडून टाकू या ठाकरे सरकारच्या विचाराशी तर आम्ही बिलकूलच सहमत नाही.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला चपराक लगावल्यानंतर आता तरी हे सरकार सुधारणार आहे का? की आता या न्यायालयांनाच तुम्ही महाराष्ट्रविरोधी ठरवणार आहात? हे सवाल आता विचारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या दोन न्यायालयांना सरकारने महाराष्ट्रविरोधी ठरवले नाही तरी खूप झाले, असा टोमणाही त्यांनी मारला.
संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
मुळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत ऐकली हे महत्त्वाचे आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा आहे, विरोधी पक्षाने त्यांच्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली, त्याचा मी आदर करतो.
फडणवीस हे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, मी विरोधकांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे. मग ही कोणती भाषा होती. त्यांची अनेक विधान माझ्या स्मरणात आहे. पण त्यांचे हे विधान गंभीर होते, धमकी देणारे नव्हते का? असा उलट सवाल राऊत यांनी फडणवीस यांना विचारला आहे.