मुंबई – मेट्रो कारशेडसाठी बुलेट ट्रेनची जागा देण्याचा निर्णय सरकार घेत असून हे हास्यास्पद आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत हेच समजत नाही, जे राज्याला आणि सरकारला देखील बुडवायला निघालेत, असेही फडणवीस म्हणाले.
नागपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी त्यांनी आज संवाद साधला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी सुरु आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारला मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी देण्याचा निर्णय हास्यास्पद असून हा पोरखेळ चालवला आहे.
बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या आत करायचे ठरवले तर त्याचा खर्च जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपये इतका असेल. मात्र 500 कोटींमध्ये होणाऱ्या स्टेशनला जर पाच ते सहा हजार कोटी लागणार असतील तर तो भुर्दंड बसेलच. शिवाय त्याचा वार्षिक देखरेखीचा खर्च देखील पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कांजूर मार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्यास स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकार पुन्हा कार शेड हलवण्याच्या तयारीत आहे. मेट्रो-3च्या कारशेडसाठी आता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होते आहे.
कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर कोर्टात ही सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्याचा मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो- चे कारशेड वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.