मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार संघर्ष सुरु आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांची ताकद पणाला लागणार आहे. बंडखोर गटाला घेऊन भाजप सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे अशी चर्चा आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना फोन करून बहुमतासाठी विनंती केल्याची माहिती आहे.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपच्या पारड्यात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विनंती केल्याची माहिती आहे. उद्या दिनांक 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. तर याच बाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेनेतील आमदांरांची बंडखोरी आणि भाजपने टाकलेला डाव या स्थितीत बहुमत चाचणी झाल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची दाट शक्यता आहे. मात्र बंडखोर आमदारांपैकी काहींची मनं अजूनही बदलू शकतात, अशी एकमेव आशा शिवसेनेला आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कारवाईची प्रलंबित याचिका असताना राज्यपाल एवढ्या तडकाफडकी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश कसे देऊ शकतात, हे कारण घेऊन शिवसेना कोर्टात पोहोचली आहे.