मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोलमडून शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता महिना उलटला आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. एकीकडे विरोधक मंत्रिमंडळ विस्तारास झालेल्या विलंबावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना दिसतायेत, तर दुसरीकडे सत्ताधारी, विरोधक सत्तेत असताना मंत्रिमंडळविस्तारास किती वेळ लागला होता याची आठवण करून देतायेत. अशातच आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून शाब्दिक चकमक झाली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून, शिंदे-फडणवीस सरकारवर शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे बोलताना निशाणा साधला होता. पवार यांनी, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्वत:ची मंत्रीपदे घेतली आणि इतर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले, हा तर लोकशाहीचा खून आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसले पाहिजे,” अशी टीका केली होती.
अशातच, पवार यांच्या घरी बसा टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्लीहून प्रत्युत्तर दिले आहे. “माहिती असतानाही फक्त राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना अधिकार होते. त्याआधीही आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना हे अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नव्हेत देशात ही पंरपरा आहे. सरकार जनतेचं असून, जनतेचे मुख्यमंत्री आहेत. जनताच महाराष्ट्रात निर्णय घेईल.” असं फडणवीस म्हणाले.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
यावेळी बोलताना फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या अपात्रतेच्या कारवाईचा व मंत्रिमंडळविस्ताराचा काहीही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास मज्जाव केलेला नाही त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.