रायपुर – छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांच्या समस्यांवर तेथील सरकारने बहुआयामी धोरण आखले असून त्यांनी नक्षलवाद रोखण्याबरोबरच तेथील विकास कामांनाही प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. त्यासाठी नक्षलग्रस्त भागात पोलिस बंदोबस्तात रस्तेविकासासारखी कामे करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यासाठी बस्तर जिल्ह्यातील नक्षल भागातील एका महत्वाच्या गावात पोलिसांची एक स्वतंत्र छावणी उभारण्यात आली आहे.
राज्याचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितले की नक्षलग्रस्त दुर्गम भागात रस्ते उभारणी झाली की त्या भागात अन्यही विकास कामे वेगाने होतील व त्यातून नक्षलवादाचे प्रमाण कमी होईल अशी यात भूमिका आहे.
त्यानुसार बोडी गावात जानेवारी महिन्यात एक स्वतंत्र छावणी स्थापन करण्यात आली आहे. त्यातील पोलिस त्या भागात केल्या जाणाऱ्या रस्ते बांधणीच्या कामाला व तेथे काम करणाऱ्या कामगारांना चोख संरक्षण प्रदान करणार आहेत.राज्य सरकारने विश्वास-विकास-सुरक्षा या त्रिसूत्रीने या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बोडी गाव हे नक्षल प्रभावीत भागातील स्ट्रॅटेजीक दृष्ट्या महत्वाचे गाव आहे.
त्या परिसरात नक्षलवाद्यांचा वावर वाढल्यानंतर या भागातील रस्ते संपर्क जवळपास ठप्पच झाला होता. त्याचा तेथील अदिवासींनी मोठा त्रास सहन करावा लागला होता. आता तेथे पोलिस दल कार्यरत करण्यात आल्याने आणि तेथे मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आल्याने आदिवासींचा त्रासही कमी होणार आहे असे सुंदरराज यांनी सांगितले. ते म्हणाले की पल्ली आणि बरसुर या दरम्यान सहा सुरक्षा कॅम्प उभारण्यात आले असून तेथे पुरेसे पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे. हे सुरक्षा कर्मी तेथील रस्ते उभारणीच्या कामाला प्राथान्य देतील