कोपरगाव – निवडणुकीनंतर झालेली अतिवृष्टी, त्यानंतर आलेले करोना संकट, अशा कठीण परिस्थितीत विकासकामे सुरू करण्याचे आव्हान असताना देखील जनतेचे आभार मानायचे राहुन गेल्याची मनात खंत आहे. मात्र मतदारांचे कोरडे आभार न मानता विकासाचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावून मतदारांच्या ऋणातून उतराई होणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील मढी बु. येथील काही वर्षांपासून प्रलंबित असलेला साठवण तलावाचा प्रश्न आ. काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे. एचडीएफसी बॅंक सीएसआर अर्थसाह्य, परिवर्तन सामुदायिक विकास कार्यक्रम कार्यान्वित संस्था, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर यांच्यावतीने या तलावाच्या कामासाठी निधी देण्यात आला होता. मात्र साठवण तलावाच्या जागेवर काम सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे साठवण तलावाचे काम सुरू होण्याबाबत ग्रामस्थांनी आ. काळे यांना साकडे घातले होते.
आ. काळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून येत असलेल्या सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या. तसेच तलावाच्या कामास प्रारंभ केला. तलावाची तीन कोटी 40 लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. या साठवण तलावासाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी कालव्याच्या आवर्तनातून पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आ. काळे यांनी सांगितले.
कृषी विकास संस्थेचे अमीत नाफडे, प्रकल्प व्यवस्थापक रमेश बादाडे, सरपंच मनीषाताई गवळी, उपसरपंच अनिल गवळी, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सुनील मोकळ, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक सुभाषराव गवळी, चिमणराव गवळी, अर्जुन गवळी, अण्णासाहेब गवळी, दिलीप गवळी, प्रकाश गवळी, संगीताताई मोकळ, ग्रामविकास अधिकारी रामेश्वर नेवगे सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.