झाडे कोसळण्याच्या भीतीने टाकली छाटून : पर्यावरणाची होतेय हानी
– संगीता पाचंगे
पिंपळे गुरव – स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव परिसरात विकासकामे सुरू आहेत. काही परिसरात रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्या रस्त्यांचे खोदकाम करून नवीन रस्ता बनविला जात आहे. त्यात रस्त्याच्या बाजूच्या झाडांची मुळे तुटल्याने झाडे सुकून गेली तर काही झाडे कोसळू लागली आहेत. त्यामुळे महापालिकेचा विकास वृक्षांच्या मुळावर आला असल्याची चर्चा परिसरात होऊ लागली आहे.
पिंपळे गुरव परिसरातील काटेपुरम चौक, रामनगर, गजानननगर, विनायकनगर, गांगार्डेनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. काटेपुरम चौक परिसरातील रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर हिरवी झाडे आहेत. परंतु रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी जुना रस्ता खोदला गेला. त्यामुळे आजूबाजूच्या झाडांची मुळे तुटल्याने काही झाडे उन्मळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. तर काही झाडे पावसाळ्यात उन्मळून पडली आहेत. अशीच स्थिती नर्मदा गार्डन परिसरात झाली होती. येथे देखील विकासकामे करताना भली मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.
विकास पर्यावरणाची हानी करणारा असेल तर तो किती योग्य आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे. एक झाड मोठे होण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. परंतु महापालिका विकासकामांच्या नावाखाली अशा झाडांवर एक प्रकारे कुऱ्हाडच चालवत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामाकाजाविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पिंपळे गुरव परिसरात रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करताना काही झाडांची मुळे तुटल्याने ते झाडे कलली तर काही कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. हे महापालिकेच्या उद्यान विभागाला कळविले तर महापालिकेने त्या झाडांच्या सर्व फांद्या तोडून टाकल्या. अशा कृत्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी निर्माण झाली आहे.
महापालिकेचा कारभार म्हणजे “लोका सांगे ब्रह्मज्ञान…’
महापालिका दरवर्षी नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठीझाडे लावण्याचे आवाहन करत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. लाखो झाडांचे रोपण करत आहे. परंतु विकासकामे करताना वृक्षांचा जीव वाचविण्यासाठी काही करताना दिसून येत नाही. खुशाल विकासकामात झाडे अडवी येत असतील तर काढून टाकणे अथवा त्याची मुळे तुटली असतील तर झाडाचा केवळ बुंदा ठेवण्याचे काम सध्या प्रशासन करत आहे. म्हणजे एक प्रकारे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाशान असाच कारभार चालू आहे.
विकासकामे करताना झाडांची मुळे तुटतात. त्यामुळे झाडे सुकतात किंवा उन्मळून पडू शकतात. तसेच वादळी वाऱ्यात ती पडतात. त्यामुळे आम्ही अशा धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून त्यांचे वजन कमी करतो. त्यामुळे वृक्षांची काटछाट करावी लागत आहे.
– चंद्रकांत मोरे, वनविभाग, पिंपरी चिंचवड
मागील काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे बाजूच्या झाडांची मुळे तुटल्याने झाडांची ताकद कमी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारे आले की झाडे उन्मळून पडत आहेत. तर काही झाडे झुकली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क केला असता त्यांनी झाडांच्या फांद्या छाटून टाकल्या.
– धनेश जगताप, रहिवासी