रस्ते खोदाईमुळे नागरिक, वाहनचालक हैराण
पिंपळे गुरव – करोनाने नागरिक अधीच त्रस्त आहेत. त्यात अनलॉक झाल्यापासून सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या सुरळीत सुरू झाल्या आहेत. परंतु पावसामुळे बहुतांश रस्ते खड्डेयुक्त बनले आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक एकीकडे करोना तर दुसरीकडे संथ गतीने सुरू असलेल्या विकासकामांनी हैराण झाले आहेत. कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महापालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात कामे सुरू आहेत. पिंपळे गुरव परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याची कामे सुरू आहेत. येथील जगताप पेट्रोल पंप ते जवळकरनगर तसेच जगताप पेट्रोल पंप ते सृष्टी चौक येथील रस्त्यांची कामे मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक, पादचारी तसेच वाहनचालक यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
विकासकामे करताना पूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना, वाहनचालकांना रस्त्याने प्रवास करणे कठीण होत आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने खोदलेले रस्ते पूर्ण चिखलमय होत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालक येथे घसरून पडत आहेत. तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडत आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
पिंपळे गुरव परिसरात एकच पेट्रोल पंप असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याचे काम सुरू असल्याने नेहमी रस्ता बंद केला जातो. त्यामुळे संपूर्ण वैदवस्तीला वेढा घालून पेट्रोल भरण्यास वाहनचालकांना यावे लागत आहे.
सूचना फलकांचा अभाव
कोणतीही विकासकामे करताना रस्त्याच्या बाजूला नागरिकांसाठी सूचना फलक लावणे गरजेचे आहे. परंतु शहरातील बहुतांश ठिकाणी विकासकामे करताना सूचना फलक लावण्यात येत नाहीत. त्यामुळे नागरिक अथवा वाहनचालक यांना अपघात होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकांची उपासमार
मागील चार ते पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला गाळ्यांमध्ये ज्यांची दुकाने आहेत त्यांचे करोनाने अधीच कंबरडे मोडले आहे त्यात या विकासकामामुळे पूर्ण धंदाच बसला आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यामुळे व्यवसाय करण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत.
रस्ते खोदल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. येथील महिलांना, नागरिकांना या रस्त्याने ये-जा करताना अपघात होत आहेत. पावसामुळे खोदलेले रस्ते चिखलमय बनत आहेत. त्यामुळे त्वरित ही विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
– कैलास पेटकर, स्थानिक रहिवासी