अलिगड – राजकारण थांबवता येऊ शकते पण विकासाचे काम थांबवता येऊ शकत नाही. विकासाकडे राजकारणाच्या भिंगातून बघण्याची गरज नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुढे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव आज साजरा झाला. या कार्यक्रमात टपाल खात्याने विद्यापीठावर काढलेल्या एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सहभागी होण्याची गेल्या पाच दशकातील ही पहिली वेळ आहे.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की सध्या लोक मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरवत आहेत. हे सगळीकडेच पहायला मिळते आहे. नवीन भारताच्या उभारणीसाठी समान आधारावर आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेखाली आपण सारे एकत्र येऊ शकतो.
मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे याचा उल्लेख करून मोदींनी यावेळी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की गेल्या काहीं वर्षात मुस्लिम मुलींच्या ड्रॉप आऊटचे प्रमाण कमी झाले आहे ही चांगली बाब आहे. मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाकची प्रथा आता रद्द झाली आहे याचाहीं उल्लेख मोदींनी यावेळी केला.
तसेच भाजप कोणत्याहीं धर्माच्या विरोधात नाहीं असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचेही भाषण झाले. या विद्यापीठाच्या समारंभाला पंतप्रधानांनी उपस्थिती दाखवण्याची गेल्या पाच दशकातील ही पहिली वेळ असली तरी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चार वेळा या विद्यापीठाला भेट दिली आहे. 1948 साली त्यांना या विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली आहे.