राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 11 डिसेंबर रोजी “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे, यानिमित्त हा विशेष लेख.
प्रवासाचा वेळ कमी होणार
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. यामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त 8 तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी 13 तास लागत होते; आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ कमी होणार आहे.
घोषणा ते पूर्तता
नागपूर व मुंबई प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी “नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करणार,’ अशी घोषणा केली होती. दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये आहे. या महामार्गांतर्गत एकूण 1901 कामांपैकी 1787 कामे पूर्ण झाली असून, 114 कामे प्रगतीपथावर आहेत.
विकासाचा राजमार्ग
या महामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या जनतेच्या जीवनात यामुळे मोठे परिवर्तन घडणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन एक वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. या रस्त्यामुळे रोजगाराची संधी निर्माण होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा राजमार्ग निर्माण होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या आरामासाठी महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या रस्त्यांमुळे प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होऊन शेतमालाची जलद वाहतूक होण्यास मदत होईल.
पर्यावरण रक्षण
वन्यजीवांना हानी पोहोचू नये यासाठी 100 महामार्गांलगत वन्यजीव मार्ग तयार करण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या वावरासाठी ध्वनिरोधकाची सोय करण्यात आली आहे. हजाराहून अधिक शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखांहून अधिक वेलींचे लावल्या जातील. प्रवासात अपघात झाला, तर तत्काळ मदत मिळावी यासाठी 15 वाहतूक सहाय्य केंद्र, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी 21 जलद प्रतिसाद वाहने आणि लाइफ सपोर्ट सिस्टिमसह 21 रुग्णवाहिका उपलब्ध असतील.
वाहनांना तत्काळ इंधन मिळावे, यासाठी देखील खबरदारी घेण्यात आली आहे. 138.47 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जाईल, 22 जिल्ह्यांना गॅस उपलब्धतेची निश्चिती, वाहन चार्जिंग स्टेशनमुळे ऊर्जा बचत होण्यास मदत होईल. वाहनांना टोल आकारणीसाठी “फास्ट टॅग’ प्लाझा निर्माण करण्यात येणार आहे. दक्षिण कोरिया सरकारशी झालेल्या करारानुसार या मार्गावर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम लागू केली जाईल.
पाच लाख लोकांना रोजगार
“कृषी समृद्धी केंद्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन शहरांची उभारणी या मार्गावर केली जात आहे. अशा नवीन शहरांच्या विकासासाठी 18 स्थळे ठरवलेली आहेत. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था आणि आयटी पार्क उभारण्यात येणार आहेत. या कृषी आधारित उद्योग, शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि इतर संधी उपलब्ध करून देतील. या महामार्गामुळे सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
पर्यटनाला चालना
हा महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी इ. स्थळांना जोडत असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातूनही मालाची जलद वाहतूक करण्यास सुलभ होईल.
भारताचे माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात सुवर्ण चतुष्कोनची भूमिका मांडली. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता ही शहरे चौपदरी महामार्गांनी जोडली गेली आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जिल्हे जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा त्याचाच एक भाग. हा महामार्ग विकासाचा मार्ग ठरेल. या महामार्गालगत राहणाऱ्या जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडून येईल, हे मात्र नक्की !
संध्या गरवारे खंडारे, सहायक संचालक