पुणे – शिवनेरी आणि रायगड या किल्ल्यांच्या धर्तीवर सिंहगड, राजगड, रोहीडा आणि रायरेश्वर किल्ल्यांचा विकास आराखडा बनविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आहे. येथील किल्ले सिंहगड, राजगड, रोहिडा, आणि रायरेश्वर या किल्ल्यांना वर्षभरात लाखो शिवप्रेमी भेट देतात. यापैकी रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, तर राजगडावर तब्बल 25 वर्षे स्वराज्याची राजधानी होती.
इतकेच नाही, तर स्वराज्याचा विस्तारही केला. अशा देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सिंहगड, राजगडासह, रोहीडा व रायरेश्वर या किल्ल्यांचाही ऐतिहासिक वारसा जपायला हवा.
नव्या पिढीसाठी त्यांचे संवर्धन व्हावे. त्यामुळे पर्यावरणाचा योग्य समतोल राखून वन विभागामार्फत या किल्ल्याचा विकास व्हावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.