पिंपरी – पिंपरी- चिंचवड शहर हे गेल्या 25 वर्षांत झपाट्याने वाढले आहे. त्या वेगाने सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत शहरामध्ये पुढील 15 वर्षांचे नियोजन करून विकासकामे करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार शहरात काम विकासकामे सुरू असून, पिंपरी-चिंचवड हे एक राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापलिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 16) आयुक्त राजेश पाटील गणरायाच्या आरतीनिमित्त कार्यालयात आले होते. त्यावेळी डिजिटल प्रभातला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. पुढे बोलताना आयुक्त पाटील म्हणाले, शहरामध्ये भौतिक सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे.
पिण्याचे पाणी ही मुख्य गरज आहे. शहरामध्ये मागील काळात पाण्याचे नियोजन न करता सोसायट्या उभ्या राहिल्या. ज्या वेगाने शहर वाढले त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर ताण आला आहे. नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये शहरात पाण्याची चांगली उपलब्धता होणार आहे. येथेच न थांबता पुढील 15 वर्षांसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पाण्याची उपलब्धता कशी वाढेल, सांडपाणी प्रक्रिया करून ते पुर्नवापरामध्ये कसे आणता येईल, याविषयी धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात 100 एमएलडी पाणीचा पुर्नवापर करण्याचे नियोजन सुरू आहे.
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबतच्या उपाययोजनांविषयी विचारले असता ते म्हणाले, शहरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिक बाधित झाले. आता तिसरी लाट थोपविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी यंत्रणेची तयारी असणे महत्त्वाचे आहे. ती तयारी महापालिकेने केली आहे. जास्तीतजास्त नागरिकांना लस देणे सर्वात महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत 16 लाख नागरिकांना करोनाची लस देण्यात आली आहे. जास्तीतजास्त नागरिकांना लस देण्याचे नियोजन पालिकेने
केले आहे.
स्वतःमधील क्षमता ओळखली तर यश नक्की
स्पर्धा परीक्षांबाबत बोलताना आयुक्त पाटील यांनी युवकांना स्वतःमधील क्षमता ओळखून निर्णय घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, प्रत्येक करिअरमध्ये स्पर्धा असते. त्यामुळे प्रत्येक करिअर स्पर्धा परीक्षा आहे. त्यामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करायचे असते.
त्यामुळे युवकांनी स्वतःमधील क्षमता ओळखणे आवश्यक आहे. क्षमता ओळखल्यास आपण ज्या गोष्टी ठरवतो त्या सहज करता येऊ शकतात. स्पर्धा परीक्षा देताना सुरुवातीची तयारी, तुमची आवड आणि तुम्ही घेतलेले कष्ट महत्त्वपूर्ण ठरतात. एकदा आपण ठरवले की आपल्याला याच रस्त्याने जायचे आहे तर कठीण परिश्रम घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि कठीण परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळते.