मंगेश धुमाळ; सभापतिपदाचा पदभार स्वीकारून घेतला विभागाचा आढावा
सातारा – सातारा जिल्हा परिषदेने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले असून कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबध्द आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ यांनी केले.
कृषी सभापतिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगेश धुमाळ यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन विविध योजनांच्या कार्यवाहीची माहिती घेतली. सध्या शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा भासत असून शेतकऱ्यांना तात्काळ युरिया उपलब्ध होण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. शासकीय योजनांची माहिती गावोगावी शेतकऱ्यांना झाली पाहिजे, यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना धुमाळ यांनी केल्या.
“शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करायचे आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. योजना राबवताना अडवणूक होऊ नये, याचीही खबरदारी घेण्यात यावी.
हवामानातील बदलामुळे पिकांवर, फळबागांवर त्याचा परिणाम होत असून बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी काय करावे, काय करु नये, याबाबत त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची जनजागृती झाली पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा नावलौकिक कायम राहील, असे काम आपण सगळे मिळून करुयात, असे आवाहनही धुमाळ यांनी केले.