मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात करणारी ही कारवाई असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, पोलीस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे.
गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.