दौंड तालुक्यात परतीच्या पावसाने उडाली दाणादाण
कुरकुंभ – दौंड तालुक्यातील अनेक गावांत झालेल्या परतीच्या पावसामुळे बाजरी, ज्वारी, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव, कौठडी, लाळगेवाडी, या भागात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यात तीन-चार मोठे पाऊस वगळता फारसा पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे काही भागात बाजरीची उशीरा पेरणी झाल्याने बाजरी काढायला येताच परतीच्या पावसाने या भागात जोर धरल्याने उभ्या पिकलाच तर काही ठिकाणी शेतातच बाजरीची कणसे कापून ठेवली होती, तर मळणी यंत्रावर बाजरी करण्याच्या तयारीत असतानाच पावसाचा जोर वाढल्याने शेतातच बाजरीच्या कणसांना अंकुर फुटले आहेत.
या पिकांबरोबर जनावरांचा चारही ही उद्ध्वस्त झाला आहे. उभ्या पिकांत पाणी साचले आहे. काही शेतातील उभ्या पिकांत साचलेल्या पाण्यात शेतकरी आपले भवितव्य शोधत आहे. रब्बी पिकाची धूळधाण झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याचे सध्या चित्र या भागात आहे.
सध्याच्या परिस्थितीत वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसाने आता तर शेतांमध्ये पाणी साचून पिकांनाच तळ्याचे स्वरूप आले आहे. शासनाने तातडीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र पंचनामे सुरू आहेत. दौंड तालुक्यातील त्या-त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. कुरकुंभ परिसरातील कुरकुंभचे ग्रामसेवक ताराचंद जगताप, तलाठी संतोष इडुळे, कृषी सहायक यांनी परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करायला सुरुवात केली आहे.
साचलेल्या पाण्यात शेतकरी शोधताहेत भवितव्य
दौंड तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे सर्वत्र पंचनामे सुरू असून अंदाजे सहा हजार पाचशे हेक्टरच्या आसपास क्षेत्र बाधित दिसत आहे.त्यातील तीन हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्राचे पंचनामे झालेली आहेत. प्रत्येक गावातील तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांच्या मार्फत पंचनामे सुरू आहेत.
– संजय पाटील, तहसीलदार