मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा छोट्या मालिकांमधून चर्चेत राहणाऱ्या अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अलका कबुल यांच्या मुलीचा विवाह नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याला चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थिती होती. यात ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीसुद्धा उपस्थित होते. त्यांनी या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ती पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
हे फोटो शेअर करत त्यांनी अलका यांने दोन्ही मुलींना लहानाचे मोठे कसे केले हे देखील सांगितले आहे. ‘माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान किंवा जीव की प्राण काय असेल तर ती असते ‘लेक’. लेकी कशा पटकन मोठ्या होतात आणि एक राजकुमार येतो, दोघ उंच भरारी घेतात, आपण आनंदानं त्यांचं उड्डाण पाहत राहायचं. समीर आठल्ये आणि अलकाताईंची लेक ईशानी.. ती खरंच एक पायलट आहे आणि तिचा विवाह ज्याच्याशी झाला.. निशांत वालिया, तोसुद्धा पायलटच आहे. म्हणजे खरंच ते आकाशात दोघेही भरारी घेतात. ईशानी परदेशात विमान चालवायचं प्रशिक्षण घेण्यासाठी निघाली होती, तेव्हा मी तिला म्हणालो होतो एक दिवस मला तू जे विमान चालवतेस त्या विमानाने प्रवास करायचा आहे. माझ्या काही स्वप्नांपैकी ते एक स्वप्न आहे. लेकी जेव्हा अशा भरारी घेतात, यशस्वी होतात, त्यामागे आई-वडिलांचे खूप परिश्रम असतात, आईचे थोडे जास्तच’ असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, ‘मी आणि अलकाताई गेली वीस वर्षे एकत्र सिनेमांमध्ये काम करत आहोत. आमचे प्रोफेशनल रिलेशन तर आहेतच पण त्यापेक्षाही फॅमिली रिलेशन जास्तच. ईशानी आणि कस्तुरीला मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो. अलकाताई आणि समीरने त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत, ते मी अनेक वर्ष जवळून पाहात आलोय. आपण आदर्श ठेवावा असं हे दांपत्य आहे. दोघेही नवरा बायको कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, पण माणूस म्हणून ते त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महान आहेत. अनेक कुटुंबांना त्यांनी वर्षानुवर्षे पोसली, सांभाळली आहेत. अनेक वर्षे सिनेमांमध्ये काम करूनसुद्धा ते दोघं कधीही फिल्मी झाले नाहीत. कामानिमित्ताने सातत्याने दोघांना महाराष्ट्रभर फिरावं लागत होतं. पण एक घार जशी आपल्या पिल्लांवर आकाशातून नजर ठेवत असते, तसंच समीर आणि अलकाताईंनी दोन्ही मुलींकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना घडवलं.’
पुढे एक उदाहरण देत मिलिंद गवळी म्हणाला, ”नागपूरला मराठा बटालियन या सिनेमाच्या शूटिंगला ईशानी आणि कस्तुरीला घेऊन आल्या होत्या. चित्रपटाचा समीरच कॅमेरामन होता, मुली लहान होत्या. शूटिंग संपवून आम्ही एअरपोर्टला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यावर अलकाताईंनी गाडी वळवायला सांगितली. ज्या गेस्टहाऊसमध्ये आम्ही उतरलो होतो, त्या गेस्टहाऊसमध्ये परत घ्यायला सांगितलं. माझं महत्त्वाचं काम राहीलं, जावंच लागेल गेस्टहाऊसवर, असं त्या म्हणाल्या. अलकाताईंनी पटकन पन्नास-शंभर रुपये काढून प्रॉडक्शनवाल्याला दिले. मी विचारलं एवढ्यासाठी आपण का परत आलो? अलकाताईंचे उत्तर ऐकून मी थक्क झालो. ताई म्हणाल्या सकाळी दूध मागवलं होतं मुलींसाठी, त्याचे पैसे द्यायचे राहून गेले होते. मी म्हणालो त्यात काय एवढं? अलकाताई म्हणाल्या, कोणी म्हणायला नको, अलकाताईंच्या मुलींचे दुधाचे पैसे आम्ही दिले म्हणून.”