राहुल गोखले
प्रकाश मेहता यांनी पूल दुर्घटनेनंतर सेल्फी काढली त्याला तीन वर्षे झाली आणि आता महाजन यांनी सेल्फी काढली. या सरकारने एका अर्थाने तीन पावसाळे पाहिल्यावर देखील अनुभवांतून येणाऱ्या पोक्तपणाच्या बाबतीत हे सरकार कोरडे ठाक राहिले आहे असेच म्हटले पाहिजे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेले असताना सेल्फी घेण्यात व्यग्र असल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आणि सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. आपल्याबरोबर असणाऱ्यांना सेल्फी घ्यायची होती असे लंगडे स्पष्टीकरण महाजन यांनी अवश्य दिले; मात्र त्याने कोणाचेही समाधान होणे शक्य नाही. महाजन यांचे हे कृत्य असंवेदनशील होते यात शंका नाही आणि स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते. पूरग्रस्तांना वितरित करण्यात आलेल्या अन्नाच्या पाकिटांवर भाजप नेत्यांची छबी डकवण्याचा प्रकारही अशाच असंवेदनशीलतेचा परिचायक. संकटग्रस्तांना मदत करणे आणि पोचविणे हे सरकारचे कर्तव्यच असते. त्याचे भांडवल करणे म्हणजे कर्तव्यापेक्षा कोणाला तरी उपकृत करण्याचा प्रकार मानला पाहिजे आणि म्हणूनच तो आक्षेपार्ह आहे.
2016 मध्ये महाड येथे पावसामुळे पूल कोसळला असताना तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता हेही सेल्फी घेण्यात मश्गुल होते आणि त्यावरही टीकेचे मोहोळ उठले होते. त्याच मेहता यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी तीन वर्षे लागली आणि तीही त्या संवेदनशीलतेच्या अभावाच्या कारणाने नाहीच. तेव्हा गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक संकटे झेलली आणि परतवलेली असली तरीही असंवेदनशील मंत्र्यांच्या संकटावर फडणवीस उपाययोजना करण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.
कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्र पुराच्या वेढ्यात असताना सुरुवातीला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. इतरही मंत्र्यांना पुराचे गांभीर्य कळण्यास उशीरच झाला. अखेर ते गांभीर्य जेव्हा उमगले तेव्हा फडणवीस यांनी यात्रा स्थगित केली आणि मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाकडे धाव घेतली. वास्तविक कोणत्याही संकटाची पूर्वकल्पना ही सरकारी यंत्रणांना आली पाहिजे आणि साहजिकच मंत्र्यांनी त्यातील गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे. मात्र त्यासाठी जी दृष्टी लागते ती असावयास हवी. भाजपमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे पहिल्या फळीचे नेते आणि विशेषतः दुसरे पक्ष फोडून त्या पक्षांच्या बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात त्यांचा हातखंडा. त्यामुळे भाजपमध्ये त्यांना संकटमोचकाचा दर्जा मिळाल्याचे दिसते.
पाटील यांनी कोल्हापूरला भेट देण्यात उशीर केलाच; पण महाजन यांनी या सगळ्यावर कडी केली. त्यांनी पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी जाताना चक्क सेल्फी काढली आणि तीही चेहऱ्यावर हास्य ठेवून. केवळ सेल्फी काढली म्हणून त्यांच्यावर टीका करणारे महाजन थेट पाण्यात उतरून पूरग्रस्त भागाचा आढावा घेत होते हे विसरले का, असा सवाल लगेच भाजप आणि महाजन समर्थकांनी समाज माध्यमांवर उपस्थित केला आणि मग या मुद्द्याला वेगळेच वळण लागले. वास्तविक यासाठीच महाजन यांनी गांभीर्य आणि मुख्य म्हणजे जबाबदारी ओळखून वेळीच दिलगिरी व्यक्त केली असती तर त्याने काही इभ्रत राहिली असती.
मात्र महाजन यांनी स्पष्टीकरण देणे पसंत केले. पुराने अनेकांचे जीव जात असताना आणि हजारोंचे संसार उद्ध्वस्त होत असताना सुहास्य वदनाने सेल्फी घेणे हे कोणत्या संवेदनशीलतेत बसते याचा विचार भाजप नेतृत्वाने करावयास हवा होता आणि प्रकरण चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावयास हवी होती. अन्नाच्या पाकिटांवर कोणतेही छायाचित्र न लावायचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले हे खरे; पण ते त्याविषयी गदारोळ झाल्यावर. तेव्हा हे अगोदरच केले असते तर ती पश्चातबुद्धी ठरली नसती.
आपण विरोधी पक्षात असताना ज्या अपेक्षा त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांकडून करतो त्या अपेक्षा स्वतः सत्तेत आल्यावर आपण कृतीत रूपांतरित करावयास हव्या. 2008 मध्ये दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यावर परिस्थिती हाताळण्याऐवजी आपल्या कपड्यांच्या निवडीवर अधिक भर देण्यावरून भाजपने टीकेची झोड उठविली होती. 26/11 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ताज हॉटेलला भेट दिली तेव्हा त्यांच्या समवेत त्यांचा अभिनेता-पुत्र रितेश आणि बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा होते यावरून गदारोळ झाला होता आणि देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असे अन्य प्रसंग देखील असतील.
मात्र भाजपने त्या त्या वेळी जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वळविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यात जबाबदार पदांवर असणाऱ्या असंवेदनशील व्यक्तींच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते. भाजपचा त्या वेळचा पवित्रा अयोग्य होता असे नाही कारण राज्यकर्त्यांनी संवेदनशील असावयास हवे हे गरजेचेच आहे. तथापि त्या वेळी आपण जे बोललो; ते सत्तेत आल्यावर व्यवहारातून दाखविले तर त्याला काही अर्थ असतो. गिरीश महाजन यांची वादग्रस्त ठरण्याची ही पहिली वेळ नाही; पण पहिल्याच वेळी कारवाई न झाल्याने मग अगोचरपणा वाढतो आणि त्याची हद्द पुरातही सेल्फी काढण्यापर्यंत जाते. वास्तविक अशांची जाहीर कानउघाडणी मुख्यमंत्र्यांनी करावयास हवी; तरच इतरांना चाप बसण्यास मदत होईल. पण असे न करण्याने सगळ्यांचीच धिटाई वाढते आणि आपण काहीही केले तरी चालते कारण पक्षाला आपली गरज आहे ही वृत्ती वाढीस लागते. महाजन यांनी जे केले ते आक्षेप घेण्यासारखेच आहे यात शंका नाही.
ज्या वेळी मेहतांकडून अगोचरपणा झाला होता तेव्हाच तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्र्यांसाठी आचारसंहिता व्हावी अशी मागणी केली होती. आता विखे सरकारमध्ये आहेत; पण त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. बाजू बदलल्यावर ज्यांच्या भूमिका बदलतात त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा ठेवणे निरर्थक. सार्वत्रिक सत्ता आहे आणि सगळ्या पक्षांतून फुटून लोक आपल्या पक्षात येत आहेत म्हणून असंवेदनशील व्यवहार जर सत्ताधाऱ्यांकडून व्हावयास लागला तर तो केवळ आपल्याला कोणीही रोखू शकत नाही या बेदरकारपणातून झालेला असतो. हा बेदरकारपणा रोखावयासच हवा कारण तो ना राजकीय संस्कृतीसाठी पोषक आहे; ना सामाजिक स्वास्थ्यासाठी!