पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा गतवर्षीच्या तुलनेत 6 टीएमसी अधिक पाणीसाठा असतानाही शहराच्या पाणी पुरवठ्यावरून पाटबंधारे विभागाने पुन्हा राडारड सुरू केली आहे. विशेष म्हणजे 2 आठवड्यांपूर्वीच झालेल्या कालवा समिती बैठकीत धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणी असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय झाला असतानाही, महापालिकेने शहरासाठी 11.50 टीएमसीच पाणी घ्यावे तसेच त्यानुसारच पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी करणारे पत्र पाटबंधारे विभागाकडून पुन्हा नव्या वर्षात पालिकेस पाठविले आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्रानुसार, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशानुसार, महापालिकेस वर्षाला 10.84 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. तर राज्य शासनाने महापालिकेस प्रतिवर्षासाठी 11.50 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. तसेच, पालिका आणि पाटबंधारे विभागातही तेवढ्याच पाण्याचा करार प्रस्तावित आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका शहरासाठी प्रतिदिन 1,350 एमएलडी पाणी उचलत आहे. त्यातच, महापालिकेच्या पाणी वापराबाबत न्यायालयातही याचिका दाखल झाली असून त्याची सुनावणी सुरू आहे.
मागील वर्षापेक्षा 6 टीएमसी अधिक पाणी
मागील वर्षी 7 जानेवारी 2019 रोजी या चारही धरणांमध्ये 17.30 टीएमसी पाणी होते. तर यावर्षी याच तारखेला या चारही धरणात सुमारे 23.40 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामिण भागासाठी यावर्षी जादा पाणी आहे. त्यातच, पालिकेस जुलै 2020 अखेरपर्यंत प्रतिदिन 1,350 एमएलडीनुसार पालिकेस प्रत्येक महिन्यास दीड टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पुढील 7 महिन्यांसाठी पालिकेस सुमारे 10 टीएमसी पाण्याची आवश्यकता असेल तर, उर्वरित 13 टीएमसी सिंचन तसेच इतर कारणांस्तव शिल्लक राहणार आहे.