संजोग वाघेरे यांची भाजपावर टीका
पिंपरी – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन सुरू आहे. महाराष्ट्रातील लॉक डाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशावेळी सरकारी तिजोरीत येणाऱ्या पैशांची आवक थांबली आहे. यावेळी अनेक कार्पोरेट कंपन्याकडून सरकारला मदतीसाठी धावून येत असताना त्यांच्या मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजपकडून जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
लॉकडाउन सुरू असल्यामुळे शासकीय तिजोरीत कररुपाने जमा होणाऱ्या रक्कमेचा ओघ बंद झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मदतीचे आवाहन केल्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांनी सीएसआर फंडातून निधी देण्यास सुरुवात केली होती मात्र, या कार्पोरेट कंपन्यांनी दिलेले योगदान सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंड म्हणून गृहीत धरले जाणार नाही, असे परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढले आहे. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या परिपत्रकामुळे मुख्यमंत्री सहाय्यता मदत करणाऱ्या कंपन्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचा फटका मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बसणार आहे.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना वृक्षलागवडीसाठी सीएसआरचा निधी जमा केला होता. त्यावेळी कोणतीही आडकाठी न आणणाऱ्या वाणिज्य मंत्रालयाने देश आणि महाराष्ट्र अडचणीत असताना आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करून राजकारण केल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला आहे.