– मुकुंद ढोबळे
शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत, सणसवाडी, करंदी, शिक्रापूर औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनी प्रशासन स्थानिक गुंडांना हाताशी धरून कंपनी प्रशासन कर्मचाऱ्यांवर दहशत पसरवत असल्याचे चित्र आहे. शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनही कंपनीच्या दावणीला बांधले आहे.
शिरूर तहसील कार्यालयासमोर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्या व सणसवाडी, करंदी औद्योगिक पट्ट्यांतील दोन कंपन्यांतील कामगार कुटुंबासह धरणे आंदोलनाला बसले होते. कामगारांबाबत गंभीर प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन गंभीर नाही.
कंपनी कर्मचाऱ्यांनी याविरोधात शिक्रापूर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तक्रारी करण्यासाठी गेले. परंतु कंपनी व्यवस्थापन व पोलिसांचे संगनमत असल्याने तक्रारी न घेता त्यांचा एका साध्या कागदावर तक्रारी अर्ज घेतला आहे. आतापर्यंत कामगारांनी चाळीस ते पन्नासच्यावर तक्रारी अर्ज दोन्ही पोलीस स्टेशनला दिले आहेत. अद्याप याची साधी चौकशी पोलिसांनी केली नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. पुणे ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे कामगारांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु याबाबत कुठलीही ठोस कारवाई केली नाही. संबंधित प्रशासनाला याचा कळवळा येत नाही, हे प्रगत पुणे जिल्ह्याचे दुर्देव म्हणावे लागत आहे.