विलास मादगुडे
हिरडस मावळ – महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपास बरेच महिने होऊन गेले आहेत. परिवहन मंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी आवाहन करूनही आज तागायत एसटी सेवा पुर्ववत झाली नाही. सहाजिकच या उन्हाळ्याच्या दिवसाबरोबरच दहावी-बारावीच्या परीक्षा, लग्नसराईत एसटी सेवा चालू न झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
भोर तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी सेवा आधिच विस्कळीत आहे. त्यातच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात, तसेच नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्यासाठी, रुग्णालयात, उपचारासाठी जाताना, बाजारहाट, बॅंकयासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बससेवा वेळेवर नसल्याने खासगी वाहनांची तासन् तास वाट पाहत जादा रकमेचा भुर्दंड सहन करत धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
परिणामी मुबलक एसटी सेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांकडे प्रवासी नाईलाजाने वळलेले पहायला मिळत आहेत. प्रसंगी मोटारसायकलवर धोकादायक ट्रिपलसिट प्रवासही करीत आहेत. शाळांना उन्हाळी सुटी लागण्यास अजून एक महिना आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहून या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन एसटी सेवा पूर्ववत चालू करणे हा एकमेव उपाय असल्याचे नागरिकांचे मत आहे.
कर्मचारी संख्येअभावी बसफेऱ्या कमी
भोर आगारामार्फत सध्या टिटेघर, चिखलगाव, कारी, म्हसर, कोर्ले, महुडे या ग्रामीण भागांबरोबरच शिरवळ येता-जाता 12 फेऱ्या, पुणे स्वारगेट 24 फेऱ्या, तसेच सोलापूर, ठाणे अशा बस चालू करण्यात आल्या आहेत. मात्र अजून दुर्गाडी, शिळिंब, वरवडी, मळे, भुतोंडे या भागातील फेऱ्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आजही बंद आहे.
पीएमपी बससेवा सुरू करावी
एसटी सेवा पुर्ववत चालू होत नसल्याने या भागातील नागरिक पीएमपीएलए बससेवा चालू करण्याची मागणी करत आहेत. कामावर रुजू न झालेल्या कर्मचारी वर्गाने कामावर रुजू होऊन डबघाईला आलेली एसटी सेवा चालू करून भोर तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशीही मागणी होत आहे.
भोर आगारात 50 कर्मचारीच कार्यरत
भोर आगारात सर्व प्रकारचे 225 कर्मचारी कार्यरत होते. पैकी संपाच्या कालावधीत 62 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत.राहिलेल्या पैकी 15 चालक, 20 वाहकांसह इतर असे एकूण फक्त 50 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. खासगी 9 चालक नव्याने भरती करण्यात आले आहेत. भोर