मुंबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असली तरीही बीसीसीआय लोकेश राहुलची पुन्हा एकदा तंदुरुस्ती चाचणी घेणार आहे. त्याचा अहवाल आल्यावरच त्याची निवड अंतिम असेल का याचा निर्णय घेतला जाणार आहे.
ही स्पर्धा येत्या 27 ऑगस्टपासून अमिरातीत होणार आहेत. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान गट फेरीत एकमेकांशी खेळणार आहेत.
राहुलची आशिया स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र, नियमांनुसार त्याची बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी होणार आहे.
पुढील आठवड्यात त्याची चाचणी होणार असून, तो चाचणीत अपयशी ठरला तर राखीव म्हणून निवड झालेल्या श्रेयस अय्यरला अमिरातीत पाठवले जाणार आहे, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.