मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख पुन्हा एकदा अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असा केला होता. सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचं सांगत त्यांनी ते पायात पाय घालून आपोआपच पडेल असा दावाही केला होता.
दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या या टीकेला आता राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
दानवेंच्या टीकेचा समाचार घेताना देशमुख यांनी, ‘महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न हाणून पाडतो आणि कोरोनाच्या कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. यामुळे त्यांनी केलेली अमर-अकबर-अँथोनीचं सरकार असल्याची टीका बरोबर आहे.’ असा पलटवार केला.
देशमुख आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर लिहतात, “रावसाहेब दानवे म्हणाले की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!”
.@raosahebdanve म्हणाले की, #महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 7, 2020
यापूर्वीही दानवे यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधताना हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असल्याची टीका केली होती. त्यावेळी दानवेंच्या टीकेला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी, “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे” असा टोला लगावला होता.