व्यवसाय संकटात : महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी गावी खानावळींनाही लागली घरघर
वानवडी – पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. उपनगरांतही शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. त्यावर आधारित असलेल्या खासगी वसतिगृह व्यवसायाला मात्र सध्या उतरती कळा लागली आहे. करोनामुळे अनेक विद्यार्थी गावी परतले आहेत. या परिस्थितीमुळे वसतिगृह चालक मात्र हतबल झाले असून, ते आर्थिक संकटात आहेत.
उपनगर भागांत आभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांची संख्या मोठी आहे. येथे राज्य आणि परराज्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठीच असते. काही संस्थांमध्ये वसतिगृहांची सोय अपुरी असल्याने परिसरातील खासगी वसतिगृहांचा व्यवसाय तेजीत चालायचा. पण, करोना काळात महाविद्यालये बंद असल्याने खासगी वसतिगृह सध्या रिकामीच आहेत. बॅंकेचे कर्ज काढून उभारण्यात आलेली खासगी वसतिगृह मालक मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत.
उपनगरांच्या काही भागांत गेल्या काही वर्षांत आभियांत्रिकी, व्यावसायिक, व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या वेगाने वाढली. त्यावर स्थानिक नागरिकांनी बॅंकेचे कर्ज काढून मोठ्या इमारती बांधून खासगी वसतिगृहे सुरू केली. तर, काही नागरिकांनी खानावळी सुरू केल्या. त्यामुळे येथील रहिवाशी महिलांना व भाजीविक्रेत्यांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले. बाहेरगावी राहणाऱ्या काही नागरिकांनी या परिसरात सदनिकांमध्ये गुंतवणूक केली आहे.
या सदनिका एखाद्या कुटूंबाला भाडेतत्वावर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना देणे फायद्याचे ठरत असल्याने भाडेकरू म्हणून विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाते. कॉट बेसिसवर एका विद्यार्थ्यांकडून दर महा 1500 ते 1800 रुपये भाडे घेतले जाते. एका सदनिकेमध्ये सुमारे चार पाच विद्यार्थ्यांची सोय केली आहे. येथे बंधने फारशी नसल्याने व स्वातंत्र मिळत असल्याने आधिक पैसे मोजावे लागले. तरीही बरेचसे विद्यार्थी खासगी वसतिगृहाला प्राधान्य देत असत. मात्र, करोना काळात महाविद्यालयेच बंद असल्याने अनेक घरमालकांचे फ्लॅट व खाजगी वसतीगृह रिकामेच आहेत.
महाविद्यालये सुरू होऊन वसतिगृह मालकांची अर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत बॅंकांनी काही महिने हप्त्यांची सवलत द्यावी. तसेच महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडीत न करता हप्त्यांनी वीज बिल भरण्याची सवलत द्यावी.
– ह.भ.प ज्ञानदेव पोकळे, खासगी वसतिगृह मालक