पुणे – शालेय पोषण आहारातून बाधा झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
धेंडे म्हणाले, घटनेची माहिती घेतली असता, या शाळेला 13 ऑगस्टपासून सेंट्रल किचन सिस्टिमद्वारे रजनी महिला बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. मागील चार, पाच दिवसांपासून पोषण आहाराचा दर्जा योग्य नसल्याची तक्रार शिक्षकांनी शिक्षण मंडळाकडे केली होती. मंगळवारीही पोषण आहार परत पाठविला होता. बुधवारी सकाळी 8 वी व 9 वीच्या काही मुलांसह 70 विद्यार्थ्यांना भात देण्यात आला होता. या प्रकरणी निश्चितच हलगर्जीपणा झाल्याचे समोर येत आहे. घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच, विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च पालिकेने द्यावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही डॉ. धेंडे यांनी सांगितले.