पिंपरी, दि. 18 – राजा आंधळा होतो, तेव्हा प्रधानालाच सत्तेची सूत्रे हाती घ्यावी लागतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान होऊन सत्ता स्थापन केली. त्यांना साथ देत त्यांची ढाल बनून बाळासाहेबांचे विचार अमर करू. पुन्हा एकदा उठा, संघर्ष करा, एकत्रित व्हा, तरच बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊ, असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.
निगडीतील सिझन बेंक्वेट हॉल येथे उपनेते तथा राज्य अल्पसंख्याक कक्ष प्रदेशप्रमुख इरफ़ान सय्यद यांच्या संयोजनेतून विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. या वेळी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेला कोणतेच अधिकार नव्हते. शिवसैनिकांवर अन्याय वाढले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा आनंद होताच. मात्र मविआची कार्यप्रणाली आणि वर्तवणूक पाहता सहा महिन्यांत भ्रमनिरास झाला. शिवसेनेला ताकद मिळण्याऐवजी सत्तेतील वाटेकऱ्यांकडून तालुका प्रमुखांवरच खोटे गुन्हे दाखल केले जात होते. वरिष्ठांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष झाले.
या वेळी शिरूरचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैलाजी पाचपुते, शहर संघटक सरिता साने, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
माजी नगरसेवकांचाही प्रवेश होईल- सय्यद
इरफान सय्यद म्हणाले की, मुंबई, ठाण्यापुरती मर्यादित असणारी शिवसेना शिवसैनिकांच्या प्रयत्नामुळे राज्यात वाढली. दिल्लीश्वराची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या कॉंग्रेसी विचारधारेच्या विरोधात बाळासाहेबांनी अखेरपर्यंत लढा दिला आणि समाजहिताचे कार्य केले. हिंद ुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला प्रमाण माणून कार्य करणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अनेक पदाधिकारी जोडले जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणखीन उभारी मिळेले. शहरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक देखील प्रवेश करून सर्वांना धक्का देतील. पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीला सज्ज रहावे, असे आवाहन इरफान सय्यद यांनी केले.