मुख्यमंत्री नितीशकुमार यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील सशक्त उमेदवार म्हणून जाहीर करून त्यांनी नवा डाव खेळला. यामुळे भाजपेतर पक्षांमधील एकजुटीमध्ये आधीपासूनच असलेल्या स्पर्धेत आणखी भर पडली आहे.
बिहारमध्ये सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भूमिका यंदा बदललेली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांना वादापासून दूर ठेवू इच्छित आहेत. मवाळपणातून मतदारांना आकर्षित करत असून त्यानुसार रणनीती आखत आहेत. त्याचवेळी ते संयुक्त जनता दलाबरोबर खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागचे कारण म्हणजे 2024 ची लोकसभा निवडणूक. बिहारमधील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नाव 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर येत आहे. जेडीयू नेत्यांकडून नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील विरोधकांचा चेहरा म्हणून नितीशकुमार यांना पुढे करत आहेत. विरोधी पक्षांकडून नितीशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असेल तर ते नक्कीच देशातील या मोठ्या पदासाठी दावेदार ठरू शकतात, असे मत त्यांनी अलीकडेच मांडले आहे. यावेळी त्यांनी नितीशकुमार यांच्या दीर्घकालीन संसदीय आणि प्रशासकीय अनुभवाचा देखील उल्लेख केला. तेजस्वी म्हणाले की, नितीशकुमार यांच्याकडे 37 वर्षांपेक्षा अधिक संसदीय आणि प्रशासकीय अनुभव आहे. ते तळागाळात काम करणारे व्यक्ती आहेत. त्यांना आपल्या सहकाऱ्यांचा संपूर्णपणे पाठिंबा आहे. अशावेळी ते पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून मानले जाऊ शकतात.
तेजस्वी यादव यांनी बिहारमधील राजकीय बदलाबाबत चर्चा करताना म्हटले की, जेडीयू, राजद आणि डाव्या पक्षाने एकत्र येणे हा मोठा संकेत आहे. बिहारमध्ये झालेल्या राजकीय बदलानंतर विरोधी पक्षांत झालेल्या ऐक्यातून राजकीय संदेश दिला गेला आहे. राष्ट्रीय राजकारणात देखील त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेजस्वी यांच्या मते, लहान प्रादेशिक पक्षांनी देखील लहानसहान नफा-तोट्याचा विचार न करता लोकशाही वाचवण्यासाठी एकाच छत्राखाली येऊन सक्षमपणे लढाई करायला हवी. भाजपकडून पैसा, माध्यमे आणि प्रशासकीय यंत्रणाच्या आधारावर भारतीय समाजातील विविधता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन बळकटपणे लढा देणे आवश्यक असल्याचे ते म्हणतात. तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याने एक गोष्ट सिद्ध झाली की, नितीशकुमार यांचे नाव विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून आता जोमाने पुढे करण्यात येणार आहे. अर्थात, नितीशकुमार हे नेहमीच पंतप्रधानपदाच्या दाव्यासंदर्भात निर्माण झालेले प्रश्न टाळत आले आहेत. परंतु आता जेडीयू आणि घटक पक्षांकडून त्यांचे नाव आग्रहाने मांडले जात आहे. अर्थात, पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षाकडून कोणता चेहरा समोर येईल, याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही.
आम आदमी पक्षाने 2024 ची खरी निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात होईल, असे म्हटले आहे. केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही नाव चर्चेत आहेतच. एकंदरीत विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा नेमका कोण असेल, याचे कोडे लवकर उलगडेल, असे वाटत नाही.
एकीकडे नितीशकुमारांना राष्ट्रीय राजकारणात ढकलताना राजद नेते तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री म्हणून सक्रिय भूमिका बजावताना दिसत आहेत. तेजस्वी यांनी दुसऱ्यांदा हे पद सांभाळले आहे; परंतु यावेळी त्यांची भूमिका वेगळी राहिली आहे. ते पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमेवरून सजग दिसत आहेत. राजदच्या कोट्यातून झालेल्या मंत्र्यांना वादापासून दूर राहण्यासाठी त्यांनी एक आचारसंहिता निश्चित केली आहे. हा निर्णय पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठीचा व्यापक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. नेत्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशी तंबीच त्यांनी दिली आहे. बिहारच्या राजकीय उलाढालीत तेजस्वी यादव यांच्या आचारसंहितेवर चर्चा रंगली आहे.
भाजपच्या रणनीतीने तेजस्वी सजग
बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. भाजपकडून जेडीयू आणि राजद नेत्यांशी संबंधित असणारे वाद माध्यमांसमोर, जनतेसमोर आणले जात आहेत. दिल्लीत अलीकडेच झालेल्या भाजपच्या बैठकीत बिहारमधील राजद आणि जेडीयू यांच्याशी निगडीत भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आल्यानंतर कायदा मंत्री कार्तिकेय सिंह यांच्याविरुद्ध अपहरणाबाबत वॉरंट आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर तेजस्वी यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव यांनी देखील आपल्या जावयाला विभागीय बैठकीत सामील केल्याने वाद वाढण्याची चिन्हे आहेत. राजद कोट्यातून झालेले सहकार मंत्री सुरेंद्र यादव यांनी अपशब्द वापरल्यानंतर वाद निर्माण झाला. हे सर्व वाद पाहता तेजस्वी यादव हे राजद नेत्यांच्या प्रतिमेवरून बऱ्याच प्रमाणात सजग झाले आहेत.
राजद मंत्र्यांसाठी आचारसंहिता
तेजस्वी यादव यांनी निश्चित केलेल्या आचारसंहितेत म्हटले, की राजदच्या मंत्र्यांनी कोणतीही नवीन गाडी खरेदी करू नये, ज्येष्ठ आणि आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या कार्यकर्त्यांकडून, हितचिंतकाकडून पाया पडून घेऊ नये, मंत्र्यांनी जनतेबरोबर सभ्य आणि सौजन्यतेने वागावे, असे काही निर्देश तेजस्वी यादव यांनी मंत्र्यांना दिले आहेत. तसेच मंत्र्यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंवरून देखील मार्गदर्शक सूचना निश्चित केली आहे. भेटस्वरूपातून पुष्पगुच्छ किंवा अन्य वस्तू घेण्यापासून दूर राहा. मंत्र्यांना पुस्तक किंवा पेन यांचे देवाणघेवाण करण्यास सांगितले आहे. मतदारसंघातील कामातही प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि योजना तातडीने अमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या योजना, कामांची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यासही सांगितले आहे. “राजद’च्या फेसबुक पेज, ट्विटर खात्यावर देखील या आचारसंहितेची माहिती देण्यात आली आहे.