लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वी राबविल्याबद्दल सन्मान
राजगुरुनगर (प्रतिनिधी) – वेताळे (ता. खेड) गावात लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वी राबविल्याबद्दल वेताळे गावाला पुणे विभागीय स्तरावरील व जिल्हास्तरीय पुरस्काराने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते बक्षिसाचा धनादेश सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पुणे येथे पोलीस मैदानावर ध्वजारोहणाप्रसंगी उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध शासकीय योजनातंर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या गावांचा, संस्थांचा आणि व्यक्तींचा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, खासदार गिरीश बापट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आदिंसह विविध विभागातील अधिकारी वर्ग, विविध संस्थाचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध विभागातील ध्वजसंचलनात सहभागी झालेली पथके, नागरिक, शालेय विद्यार्थी, आणि जिल्ह्यातून पुरस्कार प्राप्त विजेते उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच बंडोपंत बोंबले, उपसरपंच मंगलताई वाळुंज, ग्रामसेविका पुनम चव्हाण, सदस्य विठ्ठल बोंबले, सारीका बोंबले, किसन बोंबले, संध्या सांडभोर, सविता बोंबले, ऍड. डी. डी. शिंदे, टी. एम. बोंबले, एम. जी. बोंबले, सुभाष बोंबले, यशवंता बोंबले, नारायण बोंबले आदींच्या उपस्थित पालकमंत्री, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वेताळे ग्रामपंचायतीला शासनाचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे आणि जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सामाजिक वनीकरणाचे पुणे विभागिय उपवनसरक्षंक रंगनाथ नाईकडे यांनी अभिनंदन केले. ग्रामसेविका पूनम चव्हाण यांनाही उत्कृष्ट प्रशासकीय कारभाराबद्दल आणि गावपातळीवर सर्व शासकीय योजना राबविल्याबद्दल जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेविका पुरस्कारचा मान
मिळवला आहे.
वनश्री पुरस्कारानेही गौरव
वेताळे ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात तिसरा क्रमांक (दोन लाखांचे बक्षीस आणि मानपत्र, सन्मानचिन्ह) देऊन गौरवण्यात आले. तर सामाजिक वनीकरण विभागाचा यंदाचा पुणे विभागाचा प्रथम क्रमांकाचा छत्रपती वनश्री ग्राम पुरस्कार मिळविला.