मुंबई – आगामी निवडणुकांच्या टृष्टीने राज्यतील सर्वच पक्ष सध्या जोरदार मोर्चेबांधणी करताहेत. अशात कधी मनसेच्या युतीच्या बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत असतात तर कधी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असते. ठाकरे आंबेडकर यांच्या युतीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपुरात माध्यमांशी संवाद साधत त्यांनी याबाबत भाष्य केलं.
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनिमित्त फडणवीस पंढरपूरमध्ये होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ठाकरे आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा सध्या सुरु आहेत त्याबद्दल काय वाटत असा सवाल त्यांना माध्यमांनी विचारला असता,”प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे जेव्हा खरोखर एकत्र येतील तेव्हा पाहू” अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली.शिवसेनेने प्रकल्पांवरून केलेल्या टीकेला देखील यावेळी फडणवीसांनी उत्तर दिले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस नेमकं यावेळी
पंतप्रधानांनी २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातील काही सुरु झाले आहेत.
निवडणुका आल्यावर ढोंगं करणारे, सोंगं घेणारे आम्ही नाही. आम्ही पाचही वर्षं काम करणारे आहेत
एकमेकाला पाण्यात पाहणारे, विरोध करणारे, ज्यांचे विचार कधीच पटले नाहीत, विचारधारा एक नाही ते आमच्याविरोधात एकत्र येत असतात.
ते कितीही वेळा एकत्र आले तरी त्यांचा समर्थ मुकाबला करण्यास भाजपा नेहमीच खंबीर आहे.
भाजपा यापुढेही त्याच ताकदीने मुकाबला करणार.