मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर एका शानदार सोहळ्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप नेत्यासोबतच शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधी समारंभानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया –
गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात एकच सरकार असल्याने भरभरून पाठबळ दिले, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो,कारण हे दोघे आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून हा कार्यकाळ यशस्वी झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच सर्वांना न्याय देणारं सरकार, आनंद देणारं सरकार असा अडीच वर्षाचा कार्यकाळ झाला. प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला, शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले हे माझे भाग्य आहे.
एकीकडे विकास प्रकल्प, लाडके भाऊ, लाडक्या बहिणी समाजाचा प्रत्येक घटक या सरकारच्या मागे राहिल्या. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. फडणवीस आणि अजित पवार यांनी खूप सहकार्य केले. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी माझे नाव सुचवले आज मी त्यांचे नाव सुचवले याचा मला आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.
अडीच वर्षातील महायुती सरकार यशस्वी झाले आणि गतिमान, त्याची कारकीर्द यशस्वी ठरली. त्यामुळे न भूतो न भविष्यात असे बहुमत मिळाले कारण या सरकारचे काम हे आहे. यावेळी आम्ही चाळीस चे साठ झालो याचे देखील मला अभिमान आहे. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन आहे.
जनतेचे सरकार असून जनतेसाठी काम केल्याने अडीच वर्षांची कारकीर्द यशस्वी झाली. गेली अडीच वर्ष सीएम म्हणजे कॉमन मन म्हणून काम केले, पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिले. आता मी डीसीएम आहे, आता मी डेडीकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करणार, असेही शिंदे म्हणाले.