मुंबई – काल झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दात ठाकरेंच्या मेळाव्याबाबत भाष्य केलं आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या मेळाव्याबाबत देखील फडणवीसांनी आपले मत व्यक्त केले आहे.
शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी ग्राउंडची कॅपिसिटी दुप्पट आहे. ती देखील तुडुंब भरली होती मुंबईसह महाराष्ट्रातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, हे प्रस्थापित करून दाखवलंय. म्हणून मी अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना “सुज्ञ व्यक्ती शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात” असा एक वाक्यात उत्तर देत त्यांनी टोला लगावला.
कालच्या भाषणाबद्दल एकनाथ शिंदेंचं फडणवीसांनी कौतुक केलं. ते म्हणाले,शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे,आम्ही काय करतोय काय करणार आहे हे त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे विकासाच्या मुद्द्याला हात घातला, हे कुठेतरी उद्धवजी मुख्यमंत्री असताना मिसिंग होत. मुख्यमंत्री असताना उद्धवजी नेहमी पक्षप्रमुखाच भाषण करायचे त्यांनी कधीही एकही भाषण मुख्यमंत्र्यांच केलं नाही असं स्पष्ट मत फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं.