मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. अजित पवार यांना सौम्य लक्षणे असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसेच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता. यावेळी कोणतेही कारण सांगण्यात आले नव्हते. नमुने चाचणीसाठी पाठवले असता अजित पवार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असे सांगितले होते. राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सकाळी उपलब्ध राहू शकणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती.
अजित पवारांनी हे ट्विट रिट्विट केले होते. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी”.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला होता. सोलापुरात बोलताना त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं. “एकही शेतकरी सुटणार नाही,” असे ते म्हणाले होते. अजित पवारांनी यावेळी तात्काळ पंचनामे पूर्ण कऱण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.