हर्षवर्धन पाटलांचा भरणेंवर आरोप : कर्मयोगीची सभा खेळीमेळीत
बिजवडी – काही निष्क्रिय लोकांमुळे आपल्या हक्काचे खडकवासला धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळाले नाही. त्यामुळे इंदापुरातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केला.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 34व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे ऊस जळाला. हा सात हजार एकर ऊस कर्मयोगीस गाळप करावा लागला. कारखान्याला कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तरीही एफआरपीपेक्षा 215 रूपये जास्त दर देऊन सभासदांना दिलासा दिला आहे. मागील आर्थिक वर्षांत कारखान्याने 55 कोटीच्या कर्जाची परतफेड केली आहे. विस्तारवाढीसाठी काढलेले सर्व कर्ज पुढील वर्षी फिटणार आहे.
उपाध्यक्षा पद्मा भोसले म्हणाल्या की, कर्मयोगी भाऊंनी हा कारखाना उभारण्यासाठी आवश्यक जमीन खरेदी केली. त्यावेळी अडचणींना सामोरे जावे लागले होते. आज हे वैभव त्यांच्या त्यागामुळे आपल्याला मिळाले आहे. त्यांनी खासगी जुना कारखाना विकत घेऊन तो सभासदांच्या मालकीचा केला आहे. दहा वर्षांचा हिशोब केला तरी जवळपास 2300 कोटी रुपये सभासदांना बिलांतून मिळाले आहेत. यावेळी पाटील व उपाध्यक्षा पद्मा भोसले तसेच सर्व संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव सभासद निलेश देवकर यांनी मांडला. त्यास सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी राघू व्यवहारे, तानाजी काळे, संदेश देवकर यांनी सूचना मांडल्या.
यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, नीरा – भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, मंगेश पाटील, संचालक भरत शहा, वसंत मोहोळकर, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हणुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, रमेश जाधव, यशवंत वाघ, मानशिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, जयश्री नलवडे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, भागवत भुजबळ, कृष्णाजी यादव उपस्थित होते.