ऍड. आंबेडकर : खर्डा येथील पवार कुटुंबियांचे केले सांत्वन
आगे हत्याकांडातील आरोपींचा याही घटनेत समावेश
खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली. त्यामुळे यातील आरोपी सुटले. खर्डा येथील बाळू पवार खून प्रकरणात देखील काही आरोपी नितीन आगे हत्याकांडातील आहेत, असा देखील आरोप ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
जामखेड – मागासवर्गीय समाजावर अत्याचार वाढतच चालले आहेत. मात्र अत्याचार होऊनही साक्षीदार फुटत असल्याने अनेक आरोपी निर्दोष सुटत आहेत. परिणामी अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल पुन्हा वाढत आहे. त्यामुळे साक्षीदाराने आपल्या जबाब न बदलता फिर्यादीमागे साक्षीदार म्हणून ठाम पणे उभे राहिले पाहिजे, असे मत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
खर्डा येथे पैशाच्या व्यवहारातून आदिवासी समाजातील बाळू बजरंग पवार यांची पाच जणांनी निर्घृण हत्या केली होती. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी खर्डा येथे येऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर जामखेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऍड. आंबेडकर म्हणाले, कुठल्याही आत्याचाराच्या घटनेत पोलिसांसमोर साक्षीदाराने जी साक्ष दिली आहे, त्यावर त्याने ठाम पणे राहिले पाहिजे.
जर साक्षीदाराने आपली साक्ष बदलली, तर आरोपी निर्दोष सुटतो व पुन्हा गुन्हा करण्यासाठी त्याचे मनोबल वाढते. गावातील मागासवर्गीयांवर अत्याचार वाढत असतील, तर ही निंदनीय गोष्ट आहे. अशा घटना घडू नयेत, म्हणून राजकीय नेत्यांनीही लक्ष घातले पाहिजे. आतिवृष्टी बाबतबोलताना आंबेडकर म्हणाले, अतिवृष्टी ने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केले आहे. परंतु यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. कोणत्याही सरकारने महाराष्ट्र टॅंकर मुक्त केला नाही. पण तो निसर्गाने केला. त्यामुळे सरकारचा टॅंकरचा खर्च वाचला आहे.