मुंबई: प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम’चा मान राखला नसल्यामुळे आमचा पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे, असे खासदार इम्तियाज जलील म्हटले होते. दरम्यान, जलील यांनी केलेलं वक्तव्य हि पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील बिघाडी अखेर समोर आली आहे.
यासंदर्भात बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओवेसी आमचे मित्र आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करु इतर काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही. परंतु इम्तियाज जलील यांनी मांडलेली भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मध्ये बिनसलं असल्याची चर्चा आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडीसंदर्भात काँग्रेस बरोबर कुठलीही चर्चा करणार नसून एमआयएम सोबत मात्र शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा करु तसेच गणेश विसर्जनानंतर आम्ही पहिली यादी जाहीर करू. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही युतीबाबत गंभीर आहे, असे वाटत नाही. उलट वंचित आघाडीला वापरून घेण्याचा काँग्रेसचा मानस दिसत आहे.