नगर – सातत्याने एकाच ठिकाणी होणारे अपघात थांबविण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील रस्ता अपघातग्रस्त स्थळांची पहाणी नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) वतीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. त्याबाबत आम्हालाही काही सूचना नसल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढेले आहे. गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल 63 अपघातांची नोंद झाली असून, या अपघातांत 65 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ही आकडेवारी समोर आली. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सातत्याने होणाऱ्या अपघात स्थळांची पहाणी करण्याचे व महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडून यारस्त्याची पहाणी करून घ्यावे.
नगर शहरात औरंगाबाद-नगर रस्त्यावरील विक्रीकर भवनासमोरील वळणावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अशाच प्रकारे नगर-पुणे महामार्गावरील सुपा येथे सर्वाधिक अपघात झाले आहेत, असे आकडेवारीमध्ये समोर आले आहे. या दोन ठिकाणी रस्त्याचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य झाले नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी झालेल्या कामांची नाशिक येथील मेरी संस्थेद्वारे महिनाभरात तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती बैठक होऊन पंधरा ते वीस दिवस उलटले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाडे याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.